आजच्या २१ व्या शतकात संगणकाचे महत्व आपण सारेच जन चांगल्या प्रकारे जाणून आहात आणि संगणक हा आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. काही वर्षांपूर्वी हाच संगणक आकाराने मोठा वयाने लहान होता, पण आता तो वयाने मोठा आकाराने लहान झाला आहे. आधुनिक काळातील विज्ञानाने दिलेली ही देणगी आहे. याने योग्य त्यावेळी प्रत्येकाला आपल्या सामर्थ्याची प्रचिती आपल्याला दिली त्यामुळे त्याने सर्वानाच जवळ केले. एकविसावे शतक हे ज्ञानयुग आहे हे बोलणे काही वावगे ठरणार नाही कारण या ज्ञानयुगाची सर्व दालने खुली झाली ती या संगणकामुळेच.
संगणकामुळे अनेक विचारांची देवाण घेवाण सुरू झाली, अनेक माहिती त्याच्यामार्फत आपल्याला मिळू लागल्या. प्रत्येक घरा-घरात आणि शाळांमध्ये हा पोहचला, त्याचा विषय ही झाला. आज शाळेतून संगणक’ हा विषय शिकवला जातो; त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना याची ओळख होऊ लागली. मग हा संगणक सर्वांना वापरता आला, तर फायदाच होईल ना? त्यामुळेच शाळेतील / घरातील प्रत्येकजण ह्या संगणकाचा मित्र व संगणक सर्वांचा मित्र बनेल.. हो की नाही ?
पण हे आपल्याला फक्त शहरांकडील शाळेतच होताना दिसत आहे. आपल्या खेड्या-पाड्यातील शाळेतील विद्यार्थी अजूनही यापासून दूर आहेत. शिक्षण हे सर्वानाच समान मिळायला हवे ना, खेड्या-पाड्यातील मुलांनी-विद्यार्थ्यांनी का ? यापासून लांब रहाव असा विचार नेहमी येतो. कारण *जगातील एकही विषय असा नाही की, ज्याची माहिती इंटरनेटद्वारे संगणकावर मिळणार नाही. म्हणूनच ही सर्वात महान क्रांती आहे; तो एक कल्पवृक्ष आहे. अन अश्या ह्या माहितीच्या खजिन्यापर्यंत पोहोचायचे असेल, तर संगणक-साक्षरता आवश्यकच आहे.*
श्री दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट-ठाणे गेली ६ वर्ष अश्या प्रकल्पावर काम करत आहे. आत्तापर्यंत १०० हून अधिक जिल्हा परिषद शाळांना संगणक वाटप करण्यात आले आहे. शिक्षक आणि विद्यार्थी दोघांकडून याचा प्रतिसाद चांगला मिळत गेला, केंद्रप्रमुख धीमते, बांगर,भोईर सरांकडून त्या शाळेची प्रगती कशी वाढत आहे, यांची माहिती मिळत गेली.
यावर्षी सुद्धा आपल्याच ग्रुपमधील *श्री संकेत चळके यांच्या Web Access Ind Pvt Ltd या नामांकित कंपनीकडून ८ संगणक संस्थेला मिळाले.* दिवाळीचा दूसरा दिन धनत्रयोदशी या दिवशी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारी पण दुर्गम भागात असणाऱ्या जि.प. शाळा गवळीपाडा येथे संगणक वाटपाची सुरुवात झाली. त्यामधील ३ संगणक सोबत घेऊन आम्ही पुढच्या शाळेत म्हणजेच शहापूर तालुक्यामधील सर्वात शेवटचा पाडा असणाऱ्या जि. प. शाळा लादियाची वाडी येथे संगणक भेट दिला आणि तेथून थेट ठाणे जिल्ह्यातील शेवटच्या वालीवरे गावातील जि. प. शाळा वालिव्हरे शाळेतील मुलांसाठी आणि तेथीलच दुर्गभ्रमंती मध्ये हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने चढण्यासाठी नेहमी भटक्याना मदत करणाऱ्या कमळू आणि कामा दादा यांच्या घरातील छोट्या ताईना संगणक भेट देवून या कार्यक्रमाची सांगता त्या निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ काढून केली. या दिवाळीत *दिपज्योति सोबत ज्ञानज्योति पेटवण्याचा एक प्रयत्न केला* आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळेच हे शक्य होत आहे.
आपला नम्र
चेतन सुमन रमेश राजगुरू
श्री दुर्गसखा
www.durgasakha.org